हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samruddhi Mahamarg । मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आज खऱ्या अर्थाने विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रववशांसाठी वरदान ठरत आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर अंतर अवघ्या ८ तासांत गाठता येत आहे. प्रवाशांचा प्रवास आरामदायी होतोय खरा, परंतु मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अजूनही प्रवाशांना खाण्यापिण्याच्या गोष्टी, टॉयलेट, पेट्रोल पंप यांसारख्या सुविधा मिळत नाहीत. मात्र आता या वर उपाय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) पुढील तीन महिन्यांत तब्बल २२ फूड प्लाझा सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे इथून पुढे समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, या २२ फूड प्लाझांपैकी ८ फूड प्लाझा आधीच सुरू झाले असून, उर्वरित १४ फूड प्लाझा येत्या तीन महिन्यांत सुरू होणार आहेत. सद्य स्थितीत समृद्धी महामार्गावर वरगडी आणि मराळ येथे दोन्ही बाजूंनी, तर मांडवा, वायफळ, मानकापूर आणि आमणे येथे एका बाजूने फूड प्लाझा सुरू झाले आहेत. मात्र आता आगामी काळात म्हणजेच पुढील ३ महिन्यात , मानकापूर, मांडवा, वायफळ आणि आमणे, दवाळा, गणेशपूर, शिवनी, ताथोड, अखतवाडा, दव्हा, डोणगाव, पोखरी, अनंतपूर आणि कडवांची या ठिकाणी दोन्ही बाजूंनी फूड प्लाझा उभारले जाणार आहेत. या नवीन फूड प्लाझामुळे प्रवाशांना खाण्यापिण्याची कसलीही चिंता भासणार नाही. तसेच शौचालये, पिण्याचे पाणी, आणि इंधनाच्या समस्याही दूर होतील.
दरम्यान, मागील काही वर्षात महाराष्ट्रात रस्ते आणि उड्डाणपुलाच्या कामांना चांगलीच गती आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवनवीन उड्डाणपुल होताना दिसत आहेत. येत्या काळात तुम्हाला समृद्धी महामार्गाचा सुद्धा विस्तार होताना दिसेल. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आदेश दिला आहे. समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर – गोंदिया, भंडारा – गडचिरोली महामार्ग कामास गती द्या, प्रकल्पांची कामे विहित कालावधीत पूर्ण करा, प्रकल्प रेंगाळू देऊ नका असे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत