हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Budget 2026 । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदा १ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्थसंकल्प सादर करतील. यंदाच्या अर्थसंकल्पात आपल्याला काय मिळणार याकडे देशातील कर्मचारी, कष्टकरी, आरोग्य आणि बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी तसेच सरकारी कर्मचारी डोळे लावून बसले आहेत. उभ्या जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला अर्थसंकल्पात काय मिळणार? कृषी क्षेत्रासाठी सरकार कोणकोणत्या घोषणा करणार याकडे सुद्धा सर्वांच्या नजरा लागल्यात. त्यातच सध्या अशा चर्चा सुरु आहेत कि शेतकऱ्यांसाठी अतिशय वरदान ठरलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे सरकार वाढवू शकते. दरवर्षी या योजनेतून शेतकऱ्याला ६००० रुपये मिळतात, आता हाच आकडा ९००० रुपयांपर्यंत जाईल असं बोललं जात आहे.
खरं तर सरकारने शेतकऱ्याच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि शेती करताना त्याला थोडा हातभार लागावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन २०१९ साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्याच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र २०१९ पासून ते आजअखेर या रकमेत सरकारने कोणतीही वाढ केलेली नाही. याउलट बियाणांच्या किमती, खतांच्या किमती मात्र दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे वर्षाला मिळणारी ६००० रुपयांची मदत हि शेतकऱ्यांना अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना आशा आहे की सरकार या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता ६००० रुपयांवरून ९००० रुपयांपर्यंत वाढवावा. तसेच किमान आधारभूत आधारभूत किमतीबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकाळापासूनच्या मागण्या सुरूच आहेत.
खरंच पीएम किसानचा हप्ता वाढेल का? Budget 2026
तज्ज्ञांच्या मते, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक फायदे असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातही वाढ होऊ शकते. सरकार ही रक्कम ६,००० वरून ९,००० रुपयांपर्यंत वाढवू शकते. असे झाल्यास, शेतकऱ्यांच्या खात्यांना दर चार महिन्यांनी २००० रुपयांऐवजी ३,००० रुपये जमा होतील. Budget 2026
२२ वा हप्ता कधी मिळणार ?
दरम्यान, मीडिया रिपोर्ट नुसार, पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळू शकतो.योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होणार नाही. जोपर्यंत तुम्ही ई केवायसी करत नाही तोपर्यंत तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. याचसोबत जमिनीचे व्हेरिफिकेशन करणेदेखील गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही .