हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठं आश्वासन दिलं होतं. पुन्हा सत्ता आल्यास 1500 रुपयांऐवजी थेट 2100 रुपये देऊ, अशी जाहीर घोषणा करण्यात आली होती. मात्र सत्ता स्थापन होऊन वर्ष उलटलं, तरी लाडक्या बहिणी अजूनही 2100 रुपयांच्या प्रतीक्षेतच आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात दिलेलं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. “2100 रुपये योग्य वेळी दिले जातील. दिलेला शब्द आम्ही पाळणारच,” असं म्हणत शिंदेंनी पुन्हा एकदा आश्वासन दिलं आहे.
“मी बोलतो ते करून दाखवतो”– Ladki Bahin Yojana
साताऱ्यात बोलताना शिंदे म्हणाले, “लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 45 हजार कोटी रुपयांचा खर्च आहे. इतक्या मोठ्या योजनेची हिंमत इतर सरकारांनी कधीच केली नव्हती. माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पहिले होते, म्हणून मी याचा विचार करुन महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेला विरोध करणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी निवडणुकीत 232 नंबरचा जोडा दाखवला. “1500 रुपयांच्या योजनेमुळे अनेक महिलांचे आयुष्य बदलले आहे. आम्ही योग्य वेळी 1500 चे 2100 रुपये करू. हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. Ladki Bahin Yojana
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी न झाल्यामुळे हजारो महिलांचे हप्ते थांबवण्यात आले होते. यामुळे सरकारवर टीकेची झोड उठल्यानंतर आता प्रशासनाला हालचाल करावी लागली आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुकांची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे अडकलेले हप्ते सुरू होण्याची शक्यता असली तरी 2100 रुपयांचं आश्वासन कधी पूर्ण होणार, हा प्रश्न अजूनही कायम आहे.