हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन RBI New Rules । एखाद्या बँकेचे कर्ज थकलं तर बँकेकडून सातत्याने फोन केले जातात. अनेकदा तर एजंटच्या माध्यामातून कर्जदारांना धमकवले जाते,. सातत्याने पैशाची मागणी केली जाते, अशा घटना आपण या अनेकदा बघितल्या असतील किंवा ऐकल्या असतील. परंतु आता वसुली एजंटचा जाच हा कायमचा थांबणार आहे. भारतीय रिजर्व बँकेने याबाबत ठोस पाऊले उचलली असून कर्ज वसुलीसाठी नवीन मसुदा नियम जारी केले आहेत. ज्याचा थेट फायदा कर्जदारांना होणार आहे.
काही महिन्यापूर्वी बिहारमध्ये वसुली एजंटच्या जाचामुळे कर्जदाराच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी गेल्या आठवड्यात पतधोरण जाहीर करताना कडक पावले उचलण्याचे संकेत दिले. त्यानुसार ही नवी नियमावली जाहीर केली.नव्या मसुद्या अंतर्गत, आरबीआयने एजंट्सच्या कामाच्या पद्धती आता निश्चित केल्या आहेत. वसुली एजंटला फक्त सकाळी 8 ते संध्याकाळी 7 दरम्यान कर्जदाराशी संपर्क साधण्याची परवानगी असेल. त्यांनी कर्जदाराच्या वैयक्तिक जीवनाचा आणि प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे. वसुली एजंटने ग्राहकांशी सभ्य भाषेत बोलणे आणि सर्व कॉल रेकॉर्ड करणे बंधनकारक असणार आहे. धमक्या, अपशब्द, बदनामी करण्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर दबाव किंवा खोटी कायदेशीर माहिती देणे यांसारख्या गोष्टी कोणत्याही वसुली एजंटला करता येणार नाहीत.
वसुलीच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. नातेवाईक, मित्र किंवा सहकाऱ्यांना फोन करणे किंवा त्रास देण्यास सक्त मनाई आहे. तसेच जर सदर कर्जदाराच्या घरी लग्न समारंभ असेल, शोक किंवा सण यासारख्या संवेदनशील प्रसंगी संपर्क साधला जाणार नाही. अयोग्य प्रसंगी’ वसुली टाळण्यावर भर देण्यात आला आहे. या नवीन नियमांचा उद्देश हाच आहे की, बँकांनी त्यांचे पैसे वसूल करत असताना कायद्याच्या चौकटीत राहून आणि माणुसकीचे पालन करून वसुली करावी. यामुळे कर्जदारांना कोणताही मानसिक त्रास होणार नाही आणि बँकांवरील त्यांचा विश्वास आणखी वाढेल.