हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Toll Payments : देशातील राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुलीची पद्धत लवकरच पूर्णपणे डिजिटल होण्याची शक्यता आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) १ एप्रिल २०२६ पासून देशभरातील टोल प्लाझांवर रोख व्यवहार बंद करण्याचा विचार करत आहे. हा निर्णय पूर्णपणे डिजिटल टोलिंग इकोसिस्टम उभारण्याच्या व्यापक योजनेचा भाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रस्तावित योजनेनुसार, राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोल व्यवहार केवळ FASTag किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सारख्या डिजिटल माध्यमांतूनच स्वीकारले जातील. रोख व्यवहार कायमचा बंद करण्यामागे टोल प्लाझांवरील कार्यक्षमता वाढवणे आणि व्यवहारातील पारदर्शकता सुनिश्चित करणे हा उद्देश आहे.
काय आहेत यामागील कारणे ?
NHAI च्या प्राथमिक आढाव्यानुसार, रोख व्यवहारांमुळे अनेक ठिकाणी लेनमध्ये गाड्यांची गर्दी वाढते, साहजिकच यामुळे प्रवाशांना टोल देण्यासाठी वाट जास्तीची वाट पाहावी लागते. अनेकदा तर आर्थिक व्यवहारावरून किंवा सुट्ट्या पैशावरून टोल नाक्यावरच वाद किंवा हाणामारी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशावेळी कॅश पेमेंट बंद करून फक्त डिजिटल पेमेंट हा एकाच पर्याय समोर असेल तर कोणतेही वाद होणार नाहीत. टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना जलद सेवा मिळेल असं बोललं जात आहे. देशभरातील १,१५० हून अधिक टोल प्लाझांवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. Toll Payments
सध्या देशातील 98 टक्क्यांहून अधिक टोल वसुली (Toll Payments) फास्टॅगच्या माध्यमातून होत आहे. याशिवाय, देशभरातील अनेक टोल प्लाझांवर UPI पेमेंट सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना पर्यायी डिजिटल पेमेंट पर्याय उपलब्ध झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांनुसार, FASTag नसताना टोल प्लाझामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांना रोखीने पैसे भरल्यास दुप्पट पैसे भरावे लागतात . तर दुसरीकडे, UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या वाहनचालकांकडून एकूण टोलच्या 1.25 पट रक्कम आकारली जाते.
प्रस्तावित उपक्रम हा NHAI च्या तंत्रज्ञान-आधारित, उच्च-कार्यक्षमता असलेल्या राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कच्या उद्दिष्टाशी सुसंगत असल्याचे सांगितले जाते. अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतरच अंमलबजावणीबाबत अंतिम चित्र स्पष्ट होईल.