हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Free Toll। लोणावळ्याजवळील वेहेरगाव- कार्ला गडावर वसलेली एकविरा आई (रेणुका माता) ही महाराष्ट्रातील आगरी कोळी समाज आणि अनेक कुटुंबांची जागृत कुलदेवी आहे. एकविरा मंदिर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. यंदा उद्यापासून म्हणजे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या ३ दिवशी एकविरा देवीची यात्रा संपन्न होत आहे. एकविरा देवीच्या यात्रेसाठी मुंबई आणि कोकणातून लाखो भाविक लोणावळ्यात मंदिर परिसरात दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर या यात्रेकरूंना मुंबई- पुणे महामार्गवर मोफत टोलची सवलत सरकारकडून देण्यात आली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
बाळ्यामामा म्हात्रे म्हणाले, सर्व देवी भक्तांना सूचित करण्यात येते की सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील एक्सप्रेसवेच्या टोलच्या अधिकाऱ्यांशी मी संपर्क केला आणि येत्या यात्रेनिमित्त मंगळवार, बुधवार, गुरुवार तीन दिवस टोल माफ व्हावा अशी त्यांना विनंती केली आणि त्यांनी देखील त्या विनंतीला मान देऊन माझं पत्र दिल्यास ते टोल माफ करतील अशा प्रकारची ग्वाही दिलेली आहे.
देवी भक्तांसाठी आनंदाची बातमी — एकविरा आईच्या यात्रेसाठी तीन दिवस टोल माफ! pic.twitter.com/P7X4os90Pl
— Balya Mama – Suresh Rekha Gopinath Mhatre (@MeBalyaMama) March 22, 2026
ज्याला ज्याला एकविरा देवीच्या यात्रेला जायचं आहे त्यांनी कृपया माझ्या कार्यालयातून पत्र घ्या आणि खासकरून आपण दर्शनासाठी जाताना व्यवस्थितपणे जा, नियमांचे पालन करा. कारण दर्शनासाठी जाताना आपला प्रवास, आपली सुरक्षितता हे देखील खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच येत्या मंगळवार, बुधवार, गुरुवार तीन दिवस टोल माफ होईल. आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी दर्शनासाठी या. यात्रेनिमित्ताने सर्व भाविक भक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. देवीमातेचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना लाभो आणि खासकरून देवीमातेच्या कृपाआशीर्वादाने आपल्या सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारे देवीमातेच्या मी प्रार्थना करतो असेही बाळ्यामामा म्हात्रे यांनी म्हंटल.
टोलमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड पडतो. त्यातच अनेकदा वादावादी होत असते, प्रवाशांचा वेळही जातो. याच पार्श्वभूमीवर एकविरा देवीच्या यात्रेला जाणाऱ्या भक्तांना टोल माफ करण्यात यावा अशी मागणी बाळ्यामामा म्हात्रे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आलं असून यात्रेकरूंना एकविरा देवीचं जणू पावली असं म्हणावं लागेल.