हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या प्रवासासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बसेस या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातामुळे मागील २२ तासांपासून वाहतूक कोंडी आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी बोगज्याजवळ प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याने मोठी गळती सुरु होती. यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मागील २० तासांपासून महामार्ग ठप्प झाला आहे. अजूनही याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याकडून मुंबईला येणाऱ्या सर्व एसटी बसेस काही तासांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्याहून मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, बोरीवली कडे जाणाऱ्या एस टी बसेसच्या फेऱ्यांचा समावेश आहे.
मंगळवारी सायंकाळी ५ वाजता ओडोशी बोगद्याजवळ झालेल्या केमिकल टँकर अपघातानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गॅस गळतीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून एक्सप्रेसवे आणि जुना मुंबई-पुणे हायवे या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या असून गाड्या कासव गतीने पुढे जात आहेत. प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय.
दरम्यान, परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार,या गॅस गळतीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये 73 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 एसटी बसचा समावेश आहे.