हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे मागील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये पावसाचा हाहाकार बघितला. खास करून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती बघायला मिळाली. शेतकऱ्याचे उभे पीक पाण्याखाली गेली. घरे, जनावरे, सार काही वाहून गेलं. आता नवीन वर्षात तरी पावसाचा रुद्रावतार बघायला मिळू नये अशी बळीराजाची अपेक्षा असतानाच आता वर्षातील पहिल्याच महिन्यात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एकीकडे भर थंडीने सर्वजण गारठले असताना महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागात पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे ते आपण जाणून घेऊयात.
या जिल्ह्यात वरुणराजा बरसणार –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रात आज ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. नंदूरबार, जळगाव, नाशिक, धुळे आणि अहिल्यानगर या भागात पाऊस पडू शकतो. या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे. बाकी इतर ठिकाणी मात्र हवामान कोरडे असेल. थंडी कायम असेल आणि दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका सोसावा लागेल. सततच्या हवामान बदलामुळे त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होताना दिसतो.
दरम्यान, राज्यात थंडी सुद्धा चांगलीच वाढली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हुडहुडी वाढली आहे. लोक सकासकाळी शेकोटी पेटवताना दिसतायत. धुळे जिल्ह्यात सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात 10.2 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर निफाड येथे 10.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत किमान तापमान 2 ते 3 अंशांनी घटणार असल्याने विदर्भासह काही जिल्ह्यांत थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बाकी इतर ठिकाणी पहाटेच्या वेळी हलकं धुकं आणि सुखद गारवा, तर दुपारच्या वेळी उन्हाचे चटके असं चित्र आहे. थंडीमुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.