हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने (Indian Railways) मागील काही वर्षात खूप मोठी प्रगती केली आहे. नवनवीन मार्गावर रेल्वेगाड्या, तिकिटांची पारदर्शक व्यवस्था, प्रवाशांना आरामदायी प्रवासाची हमी अशी पाऊले रेल्वेकडून सातत्याने उचलली गेली. आता तंत्रज्ञानातही भारतीय रेल्वेने मोठा करिष्मा करून दाखवला आहे. प्रवाशांवर चांगल्या रीतीने पाळत ठेवण्यासाठी आणि प्लॅटफॉर्मवर प्रवाशांच्या मदतीसाठी विशाखापट्टणम स्थानकावर पहिला मानवी रोबोट तैनात करण्यात आला आहे. ‘एएससी अर्जुन’ (ASC ARJUN) असं या रोबोटचे नाव असून भारतीय रेल्वे नेटवर्कवर तैनात करण्यात आलेला हा देशातील पहिलाच रोबोट आहे. महानिरीक्षक (आरपीएफ) आलोक बोहरा आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक ललित बोहरा यांनी वरिष्ठ विभागीय सुरक्षा कमांडंट ए. के. दुबे यांच्या उपस्थितीत या मानवी रोबोटचे अनावरण करण्यात आलं.
रोबोटचे नेमकं काम काय असेल ?
हा मानवी रोबोट (Robot) आरपीएफ कर्मचाऱ्यांसोबत काम करेल. विशेषतः प्रवाशांची जास्त गर्दी असताना स्थानकातील कामकाजात मदत करेल. या रोबोटचे डिझाईन हे पूर्णपणे विशाखापट्टणममध्येच तयार करण्यात आलं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर हा रोबोट बनवण्यात आला आहे. यासाठी रोबोट तयार करणाऱ्या टीमला एका वर्षापेक्षा जास्त वेळ लागला. टीमच्या अथक परिश्रमानंतर अखेर हा प्रोजेक्ट पूर्ण झाला. ऍडव्हान्स सिस्टीममध्ये भारत किती पुढे गेला आहे हे या रोबोटमुळे देशाला आणि जगाला समजेल. फेस रिकग्निशन सिस्टीमद्वारे घुसखोरी शोधणे, एआय-आधारित गर्दीचे निरीक्षण आणि आरपीएफ नियंत्रण कक्षांना रिअल-टाइम अलर्ट पाठवण्याचे काम हा मानवी रोबोट करेल. तो इंग्रजी, हिंदी आणि तेलगू भाषांमध्ये ऑटोमॅटिकली सार्वजनिक घोषणा करू शकतो, ज्यामुळे प्रवाशांना मार्गदर्शन करण्यास आणि सुरक्षा व संरक्षणाच्या बाबतीत जागरूकता वाढविण्यात मदत होईल.
आणीबाणीच्या परिस्थितीत वेळेवर प्रतिसाद देण्यासाठी या रोबोटमध्ये आग आणि धूर शोधणारी सिस्टीम सुद्धा बसवण्यात आली आहे. पूर्वनिर्धारित मार्गांवर हाफ ऑटोमेशन यंचलित नेव्हिगेशन आणि अडथळे टाळण्याच्या क्षमतेमुळे हा रोबोट तास प्लॅटफॉर्मवर गस्त घालू शकतो. महत्वाची बाब म्हणजे तो प्रवाशांशी नमस्ते आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी सॅल्यूट यांसारखे हावभाव करत संवादही घालू शकतो. आरपीएफच्या आधुनिकीकरण आणि डिजिटल परिवर्तनाच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून तैनात केलेला हा मानवी रोबोट, विशेषतः सुरक्षा, प्रवाशांना मदत, गर्दी व्यवस्थापन, स्वच्छतेचे निरीक्षण आणि सुरक्षा जागरूकता या या कामांसाठी खूपच महत्वाचा ठरेल.