हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ajit Pawar Plane Crash । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रावर संकट कोसळले आहे. मुंबईहून बारामतीला प्रचाराला जात असताना विमानाच्या लँडिंग दरम्यान हे विमान कोसळले आणि मोठा स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह ५ जणांचा यात मृत्यू झाला. परंतु अजित पवारांचा अपघात हा घातपात तर नाही ना? अशी शंका राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. यापूर्वी फक्त सोशल मीडियावर दावा करणाऱ्या अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवारांच्या अपघाताबाबत सनसनाटी दावा केला आहे. अजित पवारांचे मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज गायब असल्याचे मिटकरी यांनी म्हंटल आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, “मला हा सारा घातपात झाल्याचा संशय वाटतं आहे. 28 तारखेला सकाळी 8 वाजून 10 मिनिटींनी मुंबईतून खासगी विमानं उड्डाण करता त्या कलिना एअरपोर्टवरील आठ नंबर गेटवर अजित पवारांचं सिसीटीव्ही फुटेज दिसत नाही, ओएसडी सुद्धा त्यांच्यासोबत दिसत नाहीत,” असं मिटकरींनी यांनी म्हटलं. एवढच नव्हे तर ममता बॅनर्जी जे बोलल्या तेही सहजासहजी बोलल्या नव्हत्या. बारामतीत धुके असल्याने विमानाचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु मग तरीही बारामतीत विमान उतरवण्याची काय गरज होती ? त्या विमानाचे लँडिंग पुण्याला करता आलेच असते कि असं म्हणत या सर्व घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर खळबळजनक दावा करत अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे. अजित पवार वारंवार सांगत होते की, माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी ती उघड करेन.15 जानेवारी रोजी ते भाजपच्या भ्रष्ट्राचारा बद्दल बोलले आणि पुढील दहा दिवसात त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. हे रहस्यमय आहे. मला जस्टीस लोया प्रकरणाची आठवण झाली. जर विमानात ६ प्रवाशी होते तर फक्त ५ मृतदेह कसे मिळाले? सहावी व्यक्ती कोण होती? त्याची बॉडी का मिळाली नाही? असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला. एकीकडे सगळ्यांचे शरीर ओळखता येत नव्हते, मात्र त्याचवेळी अजितदादांच्या जवळ असलेले कागद जळालेले नाहीत. दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? ते मुंबईतून फाईल बारामतीत सुरक्षित ठेवायला घेऊन चालले होते का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.