हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येतेय. महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपमध्येच उभी फूट पडली आहे. भाजपच्या फुटीमुळे काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे. भिवंडी महापालिकेत नारायण चौधरी यांच्या नेतृत्वातील भाजपच्या 9 नगरसेवकांचा गट हा काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे भिवंडी मध्ये सत्तास्थापनेच भाजपचे स्वप्न आता धुळीस मिळण्याची शक्यता आहे.
भिवंडी महापालिकेत येत्या 20 तारखेला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. या महापालिकेत देखील कोणाकडेही बहुमत नाही. काँग्रेस 30 जागा, भाजप 22 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 12 जागा, शिवसेना 12 जागा, समाजवादी पक्ष – 6 जागा, कोणार्क विकास आघाडी – 4 जागा, भिवंडी विकास आघाडी – 3 जागा. अपक्ष – 1 जागा मिळाल्या आहेत. अशा स्थितीमध्ये भिवंडीमध्ये आपलाच महापौर करण्यासाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेमध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळतेय. मात्र आता भिवंडीमध्ये भाजपात मोठी फूट पडली आहे. नारायण चौधरी यांच्या नेतृत्वातील 9 नगरसेवकांचा गट हा काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
संख्याबळ नसताना निवडणूक लावली जात नाही, आणि भिवंडीतही हेच चित्र दिसत आहे,” असे स्पष्ट मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. भिवंडीत झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागांवर विजयी झाली असली, तरी स्पष्ट बहुमतासाठी पक्षाला १६ जागांची कमतरता भासली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘सेक्युलर फ्रंट’ची स्थापना केली आहे. या आघाडीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पाठिंबा मिळाला असून त्यांच्या १२ नगरसेवकांच्या समर्थनामुळे काँग्रेसची ताकद ४२ वर पोहोचली आहे. यानंतर अपक्ष नगरसेवकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप पूर्ण बहुमताची कोंडी फुटलेली नाही. सपकाळ यांनी स्पष्ट भूमिका मांडली की भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून पाठिंबा घेणार नाही. मात्र, भाजप सोडून इतर कोणी येण्यास इच्छुक असेल, तर चर्चा करण्यास काँग्रेस तयार असल्याचे त्यांनी सांगितले. याच दरम्यान, पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले आणि नंतर भाजपमध्ये गेलेले नारायण चौधरी आता पुन्हा ‘सेक्युलर फ्रंट’मध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी ९ नगरसेवकांसह पाठिंबा दिल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.