हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Krishna Andhale । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण (Santosh Deshmukh Murder Case) हत्येला १ वर्ष उलटून गेलं तरी या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांची टीम त्याच्या मागावर वर्षभरापासून अजूनही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो अजूनही पसार आहे. कृष्णा आंधळे नेमका आहे तरी कुठे? तो जिवंत आहे कि त्याचा सुद्धा खून झालाय?असेही प्रश्न जनमाणसांना पडला आहे. याच दरम्यान आता दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याच्याबाबत एक धक्कादायक दावा केला आहे. कृष्णा आंधळे तब्बल ३ वेळा त्याच्या गावाला आला होता. त्यावेळी तो आपल्या कुटूंबियांना भेटला असा सनसनाटी दावा करत धनंजय देशमुख यांनी खळबळ उडवून दिली आहे.
धनंजय देशमुख यांच्या दाव्यानुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरारी आरोपी कृष्णा आंधळे एकदा दोनदा नव्हे तर तब्बल ३ वेळा येऊन गेला आहे. त्याने त्याच्या कुटुंबीयांची भेट सुद्धा घेतली आहे. आम्हाला मागील ६ महिन्यात याबाबत जी काही माहिती मिळाली आहे ती आम्ही सीआयडी कार्यालयाला दिली आहे. सीआयडी कार्यालयाकडून सुद्धा हि माहिती खरी असल्याचं मान्य करण्यात आलं आहे. कृष्णा आंधळे यांच्याकडे कोणताही मोबाईल नसल्यामुळे त्याचा तपास करणे कठीण जात आहे. पोलीस प्रशासनाने कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर पकडून त्याची जिल्ह्यात धिंड काढावी आणि त्याला जेरबंद करावे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
मात्र धनंजय देशमुख यांच्या या दाव्यामुळे पोलीस विभागाची मात्र पुरती झोप उडाली आहे. पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलीस विभागाचे अपयश यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालं असून पोलीस नेमकं करतायत तरी काय असा प्रश्न पडलाय. कृष्णा आंधळे त्याच्या गावी ३ वेळा येऊन गेला हे धनंजय देशमुख यांना कळत असेल तर मग पोलिसाना याची माहिती कशी मिळाली नाही? पोलिसांनी कृष्णा आंधळेसाठी सापळा रचला नाही का? धनंजय देशमुख यांचं म्हणणं खरं आहे असं सीआयडीने मान्य केलं आहे तर मग सीआयडीने त्याच वेळी कृष्णा आंधळेला बेड्या ठोकण्यासाठी ठोस पाऊले उचलली नाहीत का? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.