हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rajya Sabha Election 2026 । राज्यसभेच्या निवडणुकीकडे आता सर्वांचं लक्ष्य असून संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाकडून फक्त एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. अशावेळी शरद पवार यांची पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याचं समोर आलं. काँग्रेस आणि ठाकरेंच्या मदतीने शरद पवार (Sharad Pawar) आरामात राज्यसभेत पोहचतील असं सुरुवातीला बोलले जात होते. मात्र आता शरद पवारांच्या राज्यसभेवरून महाविकास आघाडीतच बिघाडी आहे कि काय अशी शंका आता निर्माण झाली आहे. संख्याबळानुसार शिवसेनेचे संख्याबळ यंदा जास्त आहे असं विधान यापूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं होत. त्यातच आता ठाकरेंची बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार संजय राऊत यांनीही सुरुवातीला आमच्यात झटापट होत असते असं सूचक विधान केलं आहे.
आज सकासकाळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवार यांच्या राज्यसभेविषयी आणि आदित्य ठाकरेंच्या विधानाविषयी छेडण्यात आलं. त्यावेळी संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीची एकच जागा जाईल राज्यसभेसाठी तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. आता राज्यसभेत कोणाला पाठवायचं हा निर्णय घेताना महाराष्ट्राच्या हितासाठी, अस्मितेसाठी काम करणारं नेतृत्व कोणतं आहे ते तीन पक्ष बसून ठरवतील. मराठी भाषिकांनी संसदेमध्ये जाऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडावे यासाठी आम्ही तिथे जातो. त्यामुळे तिथे जाऊन कोणी प्रतिनिधित्व करायचं ते तिन्ही पक्ष ठरवतं,आमचा निर्णय हा एकमतानेच होणार आहे. शरद पवार या देशाचे मोठे नेते आहेत. काँग्रेसचे नेते सुद्धा निवृत्त झाले आहेत. आमच्याही प्रियंका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत . त्यामुळे तिन्ही पक्षांना एकत्र बसूनच निर्णय घ्यावा लागणार आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
उद्धव ठाकरे विधापरीषदेवर ?
दरम्यान, संजय राऊत याना विधानपरिषदेच्या जागेवरूनही पत्रकारांनी प्रश्न केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विधानपरिषदेवर जाणार का? कारण काँग्रेसचे असं म्हणणं आहे कि प्रत्येक वेळी ठाकरे आणि पवारांच्याच पक्षाला संधी का ? असा सवाल केला असता संजय राऊत म्हणाले, विधानपरिषदेवर पण निर्णय घ्यावा लागेल. प्रत्येक पक्षाला वाटतं की आपण महाविकास आघाडीतील महत्त्वाचे घटकपक्ष आहोत. आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेऊ. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेवर जावं अशी आमची इच्छा आहे, ती इच्छा आम्ही उद्धव ठाकरेंसमोर बोलून दाखवू, त्यानंतर पुन्हा आम्ही तिन्ही पक्ष बसून चर्चा करू असंही संजय राऊत म्हणाले.