हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पडणार असून आजच संध्याकाळी ५ वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. मात्र आपल्याला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी बद्दल काहीच माहिती नाही. हा निर्णय त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे असं सांगत शरद पवारांनी मोठी खळबळ उडवून दिली. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार अशा चर्चाना वेग आला असताना दुसरीकडे शरद पवारांनी अशा प्रकारचे विधान केल्याने विलीनीकरणाचे काय असा प्रश्न निर्माण होतोय? तसेच शरद पवारांना अंधारात ठेऊन सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत का? अशाही चर्चा यानिमित्ताने सुरु झाल्या.
आज सकाळीच शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना सुनेत्रा पवार यांच्या आजच्या शपथविधी बद्दल विचारलं असता धक्कादायक उत्तर दिले. सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नाही, किंवा आज शपथविधी आहे हे देखील मला माहिती नाही. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केलं. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते असून तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काय करावं हे ठरवलं. त्यावर भाष्य करणार नाही,” असं शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवार पुढे म्हणाले, अजित पवार पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतला. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रचीती दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं असं शरद पवार यांनी सांगितलं.
अजित पवार असते तर ….
यावेळी शरद पवारांची अजित पवारांच्या कार्याचे कौतुक केलं. अजित सामान्यांशी सुसंवाद ठेवून काम करणारा कर्तृत्वान नेता होता, लोकांच्या प्रश्नांची सखोल माहिती त्यांना होती. त्यांच्या कामाची सुरुवात पहाटेच व्हायची. आज अजित पवार हयात असते तर घरी दिसले नसते, फिल्डवर असते, असे म्हणत शरद पवारांनी पुतण्याच्या आठवणींना उजाळा दिला.